पुणे : कोरोना विषाणूच्या धास्तीने जगाला वेढले आहे. भारतही यातून सुटलेला नाही. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण आढळले आणि पुणे-मुंबई हे त्याचे केंद्र ठरले. परंतु, अगदीच सारे नकारात्मक नाही. कारण, राज्यातील पहिले कोरोना पॉझिटिव्ह दांपत्य कोरोनामुक्त झाले असून त्यांना पुण्यातील नायडू रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. याशिवाय इतर तिघांचेही अहवाल निगेटिव्ह असून त्यांना गुरुवारी घरी पाठवले जाईल. गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे संकेत निश्चितपणे सकारात्मक आहेत....
डॉ. प्रदीप आवटे
राज्य साथरोग नियंत्रण अधिकारी
महाराष्ट्रातील पहिल्या कोरोना रुग्णाचे नाव 'जीवनधर’
(खरं म्हणा की खोटं, नाही तर बदलून ठेवलेलं म्हणा)
सहजीवनाची पंचविशी साजरी करायला तो तिच्यासवे दुबईला गेला
आणि जगभर थैमान घालत असलेला कोरोना
या जीवनधराचा हात धरून इथं वर आला
हा योगायोग ‘विचित्र’ नाही
तो मोठा अर्थपूर्ण आहे
सूक्ष्म रूप धारण करून मृत्यू अवतीभोवती
वावरत असताना
जगण्यावरली आपली श्रद्धा बळकट करणारा ‘योगायोग’ आहे हा…!
It reaffirms our faith in life.
जगणं असं आतून मुसंड्या मारत असतं
अवखळ खोंडाने गाईला लुचावं तसं !
आज हा जीवनधर खडखडीत बरा होऊन घरी परततोय …
“अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी,’ हे उच्चरवाने सांगावं असा क्षण आहे हा …
लोकांनी गुढ्या उभारल्याहेत..
कडुनिंबाला मोहर आलाय ..
फांदीफांदीवर कोवळी पालवी फुटलीय …
निर्जन रस्त्यांना उत्फुल्ल जगण्याची
वसंतमाखली स्वप्नं पडताहेत !
“फुलून येता फूल बोलले,
मी मरणावर हृदय तोलले ’
दुरुन कुठून तरी गाणं कानावर
येतंय ...
तुम्ही ऐकताय ना ?
आपणही आपल्या तारा छेडायला हव्यात!